विश्व कल्याणाचा संदेश देणारे महावीर
_प्रवीण ऋषीजी महाराज यांचे प्रतिपादन_
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: सत्ता आणि शस्त्राच्या माध्यमातून विजय मिळवणारे जगात अनेक देश आहेत, परंतु भारतीय जैन धर्मगुरू भगवान महावीर यांनी मात्र सत्याच्या मार्गाने स्वतःवर विजय मिळवून विश्व कल्याणाचा संदेश जगाला दिला. विवेक हाच धर्म, अहिंसा हिच शिकवण आणि निरंतर कर्तव्य हेच जीवन तत्त्वज्ञान असे महावीरांचे उदात्त विचार असून ते जयंतीदिनापुरते मर्यादित नाहीत, तर आयुष्यभर अंगिकारण्याचे ते एक व्रत आहे. असे प्रतिपादन जैन गुरू प्रवीण ऋषीजी महाराज यांनी गोयल गार्डन येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.
भगवान महावीर यांच्या महानिर्वाण वर्षानिमित् “हिंदी विवेक” मासिकाने सिध्द केलेल्या ‘तीर्थंकर भगवान महावीर’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण ऋषीजी उपस्थित होते.महावीरांचे दिव्य कार्य जगासमोर आणण्याचे पवित्र कार्य हिंदी विवेकने केले आहे, असे गौरोवद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले. विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर व सुनील आंबेकर यांच्या हस्ते प्रवीण ऋषिजी महाराजांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महावीर वंदनेने करण्यात आली. सुनील आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदी विवेकच्या प्रबोधन कार्याची प्रशंसा केली. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे, सुहाना प्रवीण मसाले उद्योगाचे संचालक विशालकुमार चोरडिया, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया हे मान्यवर आणि जैन समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.